Monday, November 12, 2018

सिनेमा : '...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर'

    '...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' सिनेमा पाहिला. सिनेमा किती उत्तम आहे हे मी काही पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. पण सिनेमा बघताना मला एका गोष्टीचं वाईट वाटलं ते असं की सोशल मीडिया आणि दूरदर्शनच्या चॅनल्सनी आपण इतके वेढले गेलो आहोत, की त्यामुळे आपल्याकडची कलाकारांविषयीची नाविन्याची भावना थोडी लुप्त झालीये. म्हणजे एखाद्या सुपरस्टारचं आकर्षण कोणाला नसतं, पण चित्रपटाच्या पोस्टरवरचा कलाकार (तेही बहुतेकदा त्या कलाकाराचं पोर्ट्रेट रंगवलेलं, फोटो नव्हेच!) कधीतरीच प्रत्यक्षात बघायला मिळणं, गर्दीतून वाट काढून त्याला सेकंदभरासाठी स्पर्श करता येणं आणि त्यानंतर 'अमुक एका कलाकाराला प्रत्यक्षात बघणाऱ्या काही मोजक्या भाग्यवंतांपैकी आपण एक आहोत' ही निर्माण झालेली कमालीची फिलिंग दुर्दैवाने आमच्या पिढीच्या वाट्याला येणे नाही ! आपण आपल्या आवडत्या कलाकारांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, सोशल मीडियावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये सतत पाहत असतो; इतकंच कशाला 'facebook / instagram live' मधून थेट संवादही साधत असतो. त्यामुळे '#fan moment' ही routine चा भाग झालेली असताना आपण डॉ. काशीनाथ घाणेकरांच्या आजूबाजूच्या गर्दीइतके भाग्यवंत नाही, असं वाटतं. सोशल मीडिया ही आजची गरज आहे, त्यामुळे त्याला दोष देण्याचा अजिबातच उद्देश नाही, फक्त ती 'नवखेपणाची' मजा मिस करत असल्याचं छोटंसं दुःख आहे! 

    लेखक-दिग्दर्शक, कलाकार मंडळी, संगीताची बाजू सांभाळणारे कलाकार, संपूर्ण टेक्निकल टीम आणि या चित्रपटाच्या टीममधला प्रत्येक कलाकार; यांचं अतिशय मनापासून अभिनंदन ! सगळ्यांचीच उत्कृष्ट कामं ! ज्यांनी सिनेमा पहिला नाही त्यांनी बघा, तिकीट मिळालं तर नक्की जा पाहायला ! 


Monday, August 27, 2018

संगीत : ये वो बंधन है जो कभी टूट नही सकता...

    आत्ता नाशिक-मुंबई प्रवास करत्ये. गाणी ऐकता ऐकता 'स्वदेस'मधलं 'ये जो देस है तेरा' गाणं लागलं. माझं फार आवडतं गाणं. आजपर्यंत कितीतरी वेळा ऐकलं. पण गाण्याची ही जादू आहे. ज्यावेळी आपण गाणं ऐकतो, त्यावेळच्या मनातल्या भावनांप्रमाणे ते ते गाणं आपण अनुभवतो. आज रक्षाबंधन. माझ्या भावांना भेटले नाही. खूप मिस करत्ये त्यांना. सगळ्यांचे आपापल्या भावांबरोबरचे फोटो पाहून तर ही भावना शतपटीने दुणावली. मनात हे सगळं उपर-निचे घडत असतानाच, 'ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा, ये जो बंधन है वो कभी टूट नहीं सकता!' हे शब्द ऐकत होते. एक विचार आला मनात. वाटलं, देश आपलं रक्षण करतो, आपण या देशाची काळजी घेतो ? त्याच्यावर प्रेम करतो? किती केलं पाहिजे आपण त्याच्यासाठी?

    मला 'रक्षाबंधन' हा सगळ्यांचा सण वाटतो. भाऊ-बहिण हे नातं extra स्पेशल आहेच. पण एकमेकांचं रक्षण करण्याची जबाबदारी, त्यातलं प्रेम हे सगळं भाऊ-बहिण, पुरूष-स्त्री, माणूस-माणूस यांच्या पलिकडे गेलं तर किती छान होईल?! म्हणजे रस्त्यावरच्या कुठल्याही प्राण्यापासून, झाडापासून, पक्ष्यापासून, माणसांपासून ते अगदी वस्तूंपर्यंत. सगळ्यांचं रक्षण करण्याची भावना आपल्यात निर्माण झाली तर किती मजा येईल! आणि रक्षण करण्यासाठी कुठली आपत्ती यायची कशाला वाट बघायला हवीये! रोज एखाद्या रोपाला खत-पाणी घालणं हेही त्याचं रक्षणच आहे की! त्याच्यावरल्या प्रेमापोटी केलेलं ! असं प्रेम निर्माण झालं की किती सोपंय एकमेकांविषयी ही भावना निर्माण होणं! ओघाने आपल्या देशाविषयी! 
Let's respect, love and protect everybody, everything! Happy रक्षाबंधन!


Saturday, August 4, 2018

संगीत : सहेला रे...

    लहानपणी शास्त्रीय संगीत शिकत असताना हळुहळू जेव्हा त्याची व्याप्ती लक्षात येऊ लागली, आपण शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे हे जेव्हा कळू लागलं, तेव्हा एकएका स्वररत्नांची नावं कानावर पडू लागली. त्यातलंच एक नाव गानसरस्वती किशोरीताई आमोणकर. ताईंबद्दल ऐकलं होतं. त्यांचं गाणं अद्वितीय आहे, त्यांनी संगीताबद्दल प्रचंड चिंतन मनन केलं हे सगळं माहिती होत होतं. पण त्यावेळी माझ्या बालबुद्धीकडे त्यांच्या विचारांची व्याप्ती काय असेल याची कल्पना करण्याची शक्ती नव्हती.

    २०११ मध्ये 'पु. लं. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी'मध्ये एका कार्यक्रमाच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी गेले होते. पत्रकारीतेमध्ये बरेचदा असं होतं की तुम्हांला फक्त ठिकाण आणि वेळ सांगितली जाते एखाद्या कार्यक्रमाची. तिथे जाऊन आयत्यावेळी विषय पूर्ण कळल्यावर आपल्या बुद्धीच्या जोरावर पत्रकार शेवटी डेस्कला काय कंटेन्ट आणतो, त्यावरून त्याच्या चतुरस्रतेचा अंदाज येतो. अशीच पत्रकारीतेत नुकतीच प्रवेश केलेली मी त्या प्रेस कॉन्फरन्सला गेले होते. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे बराच वेळ प्रेस कॉन्फरन्स सुरूच होत नव्हती. सगळे पत्रकार ताटकळत थांबले होते. तेवढ्यात एकदम शांतता झाली. मी दाराकडे पाठ करून बसलेले असल्यामुळे कोणीतरी आलं हे कळलं. पण कोण ते कळेना. आणि बघते तर एखाद्या शाईच्या डोहाचा रंग ल्यालेली टेम्पल बॉर्डर आणि डाळींबी रंगाची साडी नेसलेल्या अतिशय देखण्या किशोरीताई आत आल्या आणि स्थानापन्न झाल्या. त्या दिवशी त्यांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य हे खोल डोहाप्रमाणे होतं. डोहाकडे बघत असताना त्यावरचे तरंग पाहून आपल्याला आनंद होतो, पण डोहाच्या खोलाची व्याप्ती लक्षात घेतली तर काहीतरी नवं गवसतं! त्यांचं बोलणं फार आनंददायी होतं, त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकता आले मला, तेही पत्रकारितेच्या सुरूवातीलाच, याहून भाग्य ते काय! आज काही वर्षांचा कामाचा अनुभव गाठीशी घेऊन किशोरीताईंचे जेष्ठशिष्य आणि सुप्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांचा कार्यक्रम एनसीपीएमध्ये कत्ये. किशोरीताई आणि मोगुबाई कुर्डीकरांनी रचलेल्या बंदिशी ते सादर करतायत. आज डोहाच्या गाभ्याच्या खोलीचा नुसता अंदाज आलाय, गाभा जाणून घेण्यासाठी किशोरीताईंचं अजून बरंच गाणं ऐकाचंय, आत झिरपवायचंय, कायम प्रयत्न सुरू ठेवेन!
सौजन्य : wikimedia commons

Tuesday, July 31, 2018

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 5

कृतज्ञतेचं ओझं

    निसर्गाकडून आपण सतत मागत असतो, आपल्याला त्याने सतत खूष ठेवावं अशी अपेक्षा करतो. उन्हाळ्यात तलावातलं पाणी चमचमलं पाहिजे, आपल्या सोयीनुसार पावसाळी पिकनिक ठरली तरी त्यादिवशी पाऊस पडला पाहिजे, शेकोटीची मजा घेता यावी किमान इतकी तरी थंडी पाहिजे, याशिवाय झाडाच्या सावल्यांपासून इंद्रधनुष्यापर्यंत सगळं आपल्याला हवंय. एकदम ideal नैसर्गिक scenario असला पाहिजे आमच्या अवतीभवती. मुंबईत नाही मिळत ना हे सगळं, बाहेर जाऊ, तिथे अनुभवू. लेकीन उसने अपने ख्वाब पुरे करने चाहिये!!

    निसर्ग मनुष्यासारखा नाही! त्याचं मन आभाळाएवढं आहे! तो आपल्याला मुक्त हस्ताने सगळं देतो! आम्ही खारदुंगला पास ला गेलो तेव्हा प्रचंड थंडी होती, तरी snowfall होईलसं वाटलं नव्हतं! पण वा-याबरोबर बर्फाचे कण आमच्या गाडीच्या काचेवर येऊ लागले आणि आमची excitement खारदुंगलापेक्षाही टॉपला गेली! गाडीतून हात बाहेर काढण्याचा मोह कसा आवरेल? माझ्या आयुष्यातला पहिला snowfall ! यासाठी त्याचे आभार कसे मानायचे? किती बदल झाले असतील निसर्गामध्ये एक snowfall घडण्यासाठी! त्याचं आणि आपलं टायमिंग इतकं जुळावं की चोवीस तासांपैकी खारदुंगलाच्या त्या अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासात आपल्याला snowfall अनुभवायला मिळावा ?! शिवाय मेघदूताची आठवण यावी असे ढग, जांभळ्या रंगापासून हिरव्या रंगापर्यंत हरतर्हेचे डोंगर, कापूस पिंजून ठेवावा तसं दाट दाट धुकं होतं ते वेगळंच आणि यात भर म्हणजे हे सगळं अनुभवावं World's Highest Motorable Road वर! काही माणसांचा चांगूलपणा सहन होत नाही ना, तसं काहीसं होतं तिकडे. त्याची कृपा स्विकारण्याचं बळ नसतं आपल्यात, सहन होत नाही ते ! अपराधी वाटतं कुठेतरी खोल, आत. तेव्हा ते खजिलतेचं ओझं वैयक्तिक नसतं, 'मनुष्याने' निसर्गाला गृहित धरल्याचं असतं, लाखो झाडं कापणा-या, शेकडो डोंगर फोडणा-या, समुद्रात भराव टाकणा-या हजारो हातांनी केलेल्या कर्माचं फलित असतं. आपला हात निसर्गाकडून काही ना काही घेण्यासाठी सतत आ वासून तयार असतो! पण मातीत एखाद्या 'बी'ची रूजवण करण्यासाठी पाच बोटं एकत्र येत नाहीत!
    
    लडाखच्या ट्रीपमध्ये त्याने इतकं भरभरून दिलं की निघताना मला रडू आवरलं नाही. ही प्रचिती अनेकांनी घेतलीये. गाडीतून बाहेर बघता बघता, एखाद्या vally मध्ये बसलो असताना, कधीही, कुठेही, पण रडू कशाचं येतं तेच कळत नाही.
परत आलं की मुंबईत ट्रेनमधून प्रवास करताना दोहोबाजूला साचलेले plastic चे डोंगर बघवत नाहीत, खाडीचं गलिच्छ स्वरूप बघून राग येतो माणसांचाच, फुटपाथवरून चालताना हिरव्या जाळीतली छाटलेली खोडं पाहून काळीज पिळवटतं! किती ओरबाडतोय आपण त्याला! किती गुंतलोय आपल्याच व्यापांत, ज्याच्या जीवावर जगतोय, त्याच्यासाठी काय करतो आपण? उत्तर - काहीही नाही.
    
    Contentful माणसांना जगाला काही ओरडून सांगण्याची गरज नसते. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येकजण काहीना काही शिकतो आपणहून. तो आहे तसाच आहे, न बोलता आपल्या ब-याच जाणिवा जागृत करणारा. तो तसाच आहे, निस्वार्थ वृत्तीने आपली झोळी भरणारा. तो तसाच आहे, आपल्याला सामावून घेणारा! बदलतोय आपण. आपली पात्रता खजिल होण्याचीच आहे! मी तर म्हणेन तिथे जाऊन आलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला हा अनुभव आला पाहिजे; निसर्गावर प्रेम करणारे लोक वाढण्याची शक्यता आहे!

Thursday, June 21, 2018

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 4

'शांती'स्तूप

    'शांतीस्तूप' या नावामुळे माझ्या मनात या वास्तूचं एक विशिष्ट चित्र निर्माण झालं होतं. टूरच्या शेवटच्या २ दिवसांपैकी हे एक ठिकाण असल्याने थकलेल्या शरीराला विरामासाठी आशेचा एक किरण दिसत होता. शिवाय 'लेह'मध्ये पूर्ण २ दिवस मुक्काम असल्याने आमच्या हातात ब-यापैकी वेळ होता. फुरसत के चार पल मनाच्या गाठीशी बांधून 'शांतीस्तूपा'च्या पायथ्याशी उतरलो. 'पायथा' म्हणजे आपल्या रायगड नि कळसुबाईशी तुलना नसावी, पण गिरीभ्रमणाशिवाय अशी बरंच चढूनबिढून जायची सवय आता शहरी माणसांना राहिलेली नाही, म्हणून साधारण कल्पना येण्यासाठी 'पायथा' हा शब्दप्रयोग. असो, तर, गाडीतून उतरून शांतीस्तूपाच्या दिशेने आम्ही जाऊ लागलो. म्हटलं, आता शांतीशी भेट होईल, पुढे होईल, असं जरा उजवीकडे वळलो की होईल, ठिके बाबा, किमान त्या स्तूपाजवळ होईल, छे! पण नाहीच हो ! ती शांती काही शेवटपर्यंत सापडली नाही. उलट बघावं ते नवलच ! त्या शांतिस्तूपावरच घोळका करून २५ एक जणांचं 'थेपलाप्रेमी' कुटुंब त्यांचे #eatinggoals सेट करत होते. एकमेकांना मोठ्याने हाकामारून आरडे ओरडे काय, ग्रुपफोटो काढताना हास्यकल्लोळ काय! शी शी!

    शांतीस्तूपावर कोरलेल्या सगळ्या बुद्धांनी जीवंत होऊन एकेकाच्या चांगली हाणली पाहिजे असं मला जाम वाटत होतं. पण 'बुद्धं शरणं गच्छामि' म्हणत शाब्दिक मार्गाने ते कार्य करायची जबाबदारी मी घेतली. प्रचंड चकचकीत बायका होत्या. कुणाला हितोपदेश करावा, यासाठी प्रचंड चॉईस होता मला. शेवटी काळी ५ च्या निषादाच्या आसपास गेंगाण्या आवाजात कोकलणा-या बाईची निवड मी केली. लालचुटूक टॉप, फोटोशॉपलाही लाजवेल इतकी करेक्ट मॅचिंग लिपस्टिक, टॉकटॉक शूज इत्यादींनी नटलेल्या बाईंना म्हटलं, "आंटी, ये 'शांती'स्तूप है l Atleast यहाँ तो शांती रखो और आपके पूरे family को बोलो l प्लीज, रिक्वेस्ट है l" बाई ओशाळल्या. म्हणाल्या, "सॉरी, सॉरी". हा सामंजस्य करार करून खाली उतरले आणि 'मेडिटेशन सेंटर' होतं तिकडे कुतूहल म्हणून जाऊन बसलो. बसलो आणि मेडिटेशन केलं इतकी वरची पातळी काही आपली नाही, पण किमान जागेचा आणि संकल्पनेचा मान राखून किंवा इतर चार लोक शांत बसल्येत म्हणजे या खोलीत शांत बसणं अपेक्षित असावं, इतकी सामान्य बुद्धीसुद्धा लोकांनी वापरू नये ? खरंच चीड आली मला तिथे. मला असं वाटतं नेहमी की बहुतांश भारतीयांना सोशल एटीकेट्स पाळता येत नाहीत. का कळत नाही लोकांना कुठे कसं वागायचं ? किमान लडाखच्या भागात तरी माझं हे निरीक्षण होतं की तिथे आलेले बरेच परदेशी लोक हे अतिशय अभ्यासपूर्वक, आधी जागेची माहिती घेऊन आलेले होते. फार मनापासून ते माहिती गोळा करत होते, त्या त्या जागेचे नियम पाळत होते. बाहेरची माणसं आपल्याकडे येऊन इतकं शिस्तीने वागू शकतात, आणि आपल्याला 'पिकनिक स्पॉट' आणि 'पर्यटन स्थळ' यात फरक करता येऊ नये ? सतत मनात येत होतं, या परदेशी माणसांच्या मनात कसं चित्र निर्माण होत असेल भारताचं ? ते परत आपल्या देशी जाऊन मित्र-मंडळींना काय सांगत असतील ? बाहेरचे लोक आपल्या बुद्धीची कीव तर करत नसतील ना ? का आपले लोक अशी संधी देतात त्यांना ?

    लोकहो, केवळ लडाखलाच नाही, कुठेही गेलात आणि पर्यटक त्या त्या जागेचा रुतबा समजून वागत नसतील, तर आवर्जून त्यांना तसं वागण्यापासून रोखा. लोक निर्लज्ज असतात, "तुम्हे क्या करना है" वगैरे प्रश्नांना कदाचित तुम्हांला सामोरं जावं लागेल, पण शांततेने शक्य होईल तितक्या माणसांना त्या त्या जागेत नियमाने वागण्यास सांगा. तुमचा फिरण्याचा फार वेळ आणि श्रम यात घालवू नका, पण "हमे क्या करना है" म्हणून पुढेही जाऊ नका. आपण इतर वेळी देशासाठी फार काही करू शकत नाही, ही चांगली संधी आहे!



 







Monday, June 18, 2018

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 3

Out of coverage area!

Tour सुरू झाल्यापासून ४ दिवसांनी मिळालेल्या पहिल्यावहिल्या wifi च्या पासवर्डचा फोटो आहे हा! 😁

लडाखमध्ये फोनला रेंज मिळते का? हा बहुतेक जणांचा प्रश्न असतो.
उत्तर - BSNL आणि Airtel च्या postpaid कनेक्शनला काही ठिकाणी रेंज मिळते, बाकी सगळे स्टार्ट टू एन्ड ढगात असतात. त्यामुळे in case of emergency, आपल्या गाईडचा नंबर आप्तेष्ट मंडळींना देऊन ठेवणं सर्वात इष्ट.
खरं सांगू तर मला खूप छान वाटत होतं रेंज नाहीये बघून. माझं Airtel postpaid कनेक्शन आहे. मध्ये मध्ये रेंज मिळत होती. But I didn't care that much. रहावं की थोडं स्वतःसोबत! इथे असतोच आपण सतत दुस-यांच्या बाबतीत अप टू डेट. कोणी काय पोस्ट केलं, माझ्या लेटेस्ट डिपीला किती लाईक मिळाले, व्हॉटस्अपवर किती मेसेज साचले, कोणी 'in relationship with अमूक तमूक' स्टेटस टाकलं, इ. इ. पण अशा रेंज नसलेल्या ठिकाणी जाणं हा चांगला मौका असतो स्वतःची स्वतःशी रिलेशनशीप डेव्हलप करण्याचा. Rather ती होतेच, आपण स्वतःला तेवढी स्पेस दिली तर! हे आजुबाजूचं सौंदर्य बघताना मला कसं वाटतंय, मला आवडतंय का, इथले लोक कसे राहत असतील, आपण आपल्या कुठल्या गरजा कमी करू शकतो? अशा थोड्या स्वतःशी गप्पा झाल्या तर नक्की काहीतरी छान सापडतं आपोआप. काहीतरी शोधण्याचा अट्टाहास नको, पण पुरेसा प्रयत्न मात्र असू दे; की परत आल्यावर असा स्वानुभव लिहीताना जाम भारी वाटतं! Enjoy your own company!
Best wishes!



Saturday, June 16, 2018

प्रवास : Ladakh : In Love with Ladakh - 2

The Pangong Tso!
'Tso' म्हणजे Lake.
पँगाँगचा केवळ २५ ते ३०% भाग भारतात आहे. उरलेला भाग चायनामध्ये आहे. भारतात जो भाग आहे, त्याची लांबी ४० किलोमीटर आहे. म्हणजे एकूण हा लेक किती मोठा असेल याची कल्पना आपण करू शकतो. या लेकचे पाणी खारट आहे. त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी या पाण्याचा उपयोग तेथिल माणसे करत नाहीत.
हाच लेक जर शहरी भागांत असता तर Lake Rafting किंवा तत्सम काहीतरी व्यावसायिक मार्ग शोधून माणसांनी त्याचा उपयोग करून घेतला असता. पण लडाखी रहिवाशांनी तसं काही केलेलं नाही, पँगाँगचं नैसर्गिक सौंदर्य जपलं आहे. का या माणसांविषयी प्रेम वाटणार नाही सांगा!

Friday, June 15, 2018

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 1

लेह-लडाख!
काही जागा अशा असतात की जिथे शहरी माणसांच्या व्याख्येत बसणा-या कम्फर्टेबल सोयी नसल्या तरी तिथे चैन की नींद मात्र लागते. आजुबाजूला निसर्गाचं सौंदर्य अक्षरश: भरभरून दिसत असतं. सुरूवातीचे काही दिवस वगळले की नंतर हळुहळू camera बंद करून ठेवावासा वाटतो. निसर्गापुढे हरल्याचं आणि निसर्गामुळे हरखून गेल्याचं एक वेगळंच समाधान लाभतं. खरं सांगू तर ५००-६०० फोटो काढल्येत. पण सोशल मिडियावर एकही टाकावासा वाटत नाहीये. कारण camera ही त्या सौंदर्याला न्याय देऊ शकलेला नाहीये. असं वाटतं, कशाला देखावा करायचा त्या सौंदर्याचा! किती सामान्य आहोत आपण त्या डोंगरांपुढे, आभाळापुढे, पाण्यापुढे, मातीपुढे, दगडांपुढे! तिथल्या माणसांचा साधेपणा कणभर जरी माझ्यात झिरपला, तर माझं माझ्यावरचं प्रेम वाढेल! ओळख नसतानाही 'जुले' म्हणून निखळपणे हसणारी मंडळी, 'अतिथी देवो भव' म्हणून प्रेमाने जेवू-खावू घालणारी मंडळी, आजुबाजूने वेगवेगळ्या गाड्यांतून पास होत असताना नुसता हात दाखवून 'काही लागलं तर आहे रे मी' असा शब्देविण संवादू करणारी मंडळी ही कुठल्या ग्रहावरची आहेत?! Pangong ची लांबी किती, Nubra Vally ची खोली किती, कुठल्या रूतूत किती तापमान असतं ही सगळी मापं गुगलवर मिळतील, पण इथल्या माणसांच्या मनाचा साधेपणा कसा मोजावा?!
मला वाटतं, जे अजून गेले नाहीत, त्यांनी तरूणपणीच एकदा तरी लेह-लडाखला भेट देऊन याच. 'तरूणपणीच' कारण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लागणा-या शारिरीक क्षमतेकडे दुर्लक्ष करता येत नाही. आणि एकदा जाऊन आलात, की मनाचा एक तुकडा तिथल्या एखाद्या डोंगरातच हट्ट धरून बसलेला नाही आढळला तर सांगा!
फोटो नाही टाकत. बाकी कुणाला कुठल्याप्रकारची माहिती हवी असेल, तर जरूर विचारा! शक्य तितकी मदत आनंदाने करेन! 
जुले !

Sunday, May 6, 2018

सिनेमा : Cycle

Cycle : The Film

संशोधन (Research)
भक्ती आठवले
स्वत:चं नाव मोठ्या पडद्यावर पाहताना खूप भारी वाटतं! 

२०१४ मध्ये 'सायकल' या सिनेमासाठी अदितीने गोष्ट लिहिली. तिच्या या गोष्टीसाठी काळानुरूप काय काय गोष्टी सिनेमात दाखवल्या पाहिजेत याची माहिती घेण्यासाठी...म्हणजेच रिसर्च करण्यासाठी भू गाव, राजापूर, आडिवरे, देवगड अशा गावांमध्ये फिरले. अनेक लोकांना भेटले, खूप छान अनुभव घेतले, या कामासाठी अनेकांची मदत झाली. हा सगळा अनुभव अदितीमुळे शक्य झाला. थांकू अदिती !!! 

सुरूवातीला या फिल्ममध्ये मुख्य पात्र हे 'पोस्टमन' असणार होतं. पण दरम्यानच्या काळात पोस्ट आणि पोस्टमन संबंधित काही सिनेमे आल्याने या पोस्टमनचा 'ज्योतिषी' केला गेला. हीच गंमत असते लेखकाची. परकाया प्रवेश करून ही माणसं कल्पनाविलासात रमू शकतात. त्यामुळे २०१४ ते २०१८ अशी ख-या अर्थाने 'फुरसत से बनाई हुई' ही फिल्म आहे.

आता थोडं फिल्मबद्दल. अदिती ही चांगुलपणावर विश्वास असणारी लेखिका आहे. 'कॉफी आणि बरंच काही', 'हंपी' आणि आता 'सायकल' या तिच्या आत्तापर्यंतच्या फिल्मस् कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या 'पॉझिटिव्ह'पणावर बेतल्या आहेत. लेखकांच्या कामामध्ये त्यांच्या values, त्यांची मतं रिफ्लेक्ट होत असतात. कारण बाहेरच्या गोष्टी आत झिरपून, त्यावर प्रोसेस होऊन मग त्या कामात नकळतपणे उतरायला वेळ लागतो. पण किमान सुरवातीच्या काही कामांमध्ये तरी लेखकाच्या त्या त्या स्टेजमधलं व्यक्तिमत्व बाहेरच्या गोष्टींच्या अनुशंगाने जास्त सहजपणे आणि नकळत फिल्मद्वारे रिफ्लेक्ट होतं. या फिल्मचंही तसंय. खरी, सोपी गोष्ट आहे ही. आता एखादी फिल्म जन्माला घालायची म्हणजे Box Office ची गणितं जुळू शकतील की नाही याचा विचारही करावाच लागतो. पण संपूर्ण टीमने त्या पलिकडे जाऊन जीव ओतून केलेल्या कामाला लोकांकडूनही शाबासकी मिळतेच!


Tuesday, February 27, 2018

प्रति, मराठी भाषा...

हे मराठी भाषे, कशीएस ?
अशी हिरमुसली का दिसत्येस ?
अच्छा !! अगं बाई, हे म्हणजे 'Hey !' नाही काही ! अगं आपल्या संबोधन एकवचनातलं 'हे' गं !
हाहा ! बघ तुझा चेहरा कसा क्षणात प्रफुल्लित दिसू लागलाय !
बरं, ते असूदे. उशीर झालाय, पण मी आज तुझे आभार मानायला आल्ये.
का म्हणजे ? अगं तू आजची उत्सवमूर्ती !
छे छे ! तुला बरं वाटावं म्हणून नाही गं ! पण आजच्या निमित्ताने माझ्या मनातला तुझ्या विषयीचा आदर आणि प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचवू म्हंटलं.
welcome ? बापरे, आमच्यासारखा तू कशाला इंग्रजीचा आधार घेत्येस ?
नको गं ! तू आहेस तशीच रहा गं ! तू अशीच आवडतेस मला!
माझ्यापरीने नटवत असते मी तुला. कधी स्टेटसच्या रूपात, कधी लेखाच्या वेशात, तर कधीतरी चारोळीही जमून जाते. मित्रमंडळींकडून कौतूक होतं, पण हे तुझ्यामुळे होतं गं! तू मला इतकं आपलंसं केलंयस ना, की बास! लिहिण्याचं स्फुरण तुझ्यामुळे चढतं.
तू आहेस तशीच रहा गं ! तू अशीच आवडतेस मला!
- तुझी कायमची मैत्रीण,
भक्ती

Friday, February 16, 2018

आजी !

आज मीच केलेल्या कोशिंबीरीचा पहिला घास खाल्ला आणि आजीची आठवण आली. ती करायची तशी चव झालीये आज अगदी! तिच्या हातची आमटी, ताक-लोणी सगळं आठवलं एकदम. तिच्या त्या छोट्या फुलांचं डिझाईन असलेल्या पांंढ-या शुभ्र साड्या, पोलक्याची छोटीशी घडी करून त्या त्या साडीत ठेवण्याची सवय, घरी असली तरी तिन्हीसांजेला वेणी-फणी करून बसण्याची सवय, लोकसत्तेतलं शब्दकोडं सोडवायचा नित्यक्रम आणि टिव्हीवरच्या आवडत्या मालिकांचे भाग, रिपीट भाग म्हणजे जीव की प्राण! दामिनी, घरकूल पासून कसौटी जिंदगी की पर्यंत सगळ्याच्या स्टो-या मला टिव्ही न बघताच कळायच्या! प्राणीप्रेमही माझ्यात तिच्याकडूनच आलं असावं. अलिबागला आमच्या जुन्या घरातल्या ओटी, पडवी, माजघरात कित्येक मांजरींची बाळंतपणं प्रेमाने केली तिने. आज या कोशिंबीरीमुळे स्वयंपाकघरात कामात असणा-या आजीच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज येतोय की काय असंही वाटून गेलं! असो! आणखी लिहवत नाही! असतात अशी काही समीकरणं जुळलेली...कायमची! 
Miss you आज्जी! 

Thursday, January 25, 2018

माझं कौतुक !


    I have clicked this picture and I liked it ! 😊
    आपण बरेचदा आपल्या प्रयत्नपूर्वक केलेल्या कामाची स्तुती झाली तरी लगेच "छे हो, तुमच्याएवढं छान कुठे जमतं आम्हांला!" म्हणून स्वतःचं स्थान मोजण्यासाठी दुस-याची फूटपट्टी वापरतो किंवा मग "जो है, भगवान की दया से है" म्हणून त्या बिचा-याच्या खांद्यावरून बंदूक चालवतो.
    पण का ना?! एखादा फोटो असतो खरंच प्रयत्नपूर्वक काढलेला, एखादं पेंटिंग असू शकतं आपल्या विचारांतून प्रत्यक्षात आलेलं, असते एखादी घोटलेली मूरकी, असतो कसलेला कमाल अभिनय! घ्यावी की जबाबदारी त्याची, घ्यावं की कौतूक करून आणि मारावी आपल्याच कामाला एक घट्ट मिठी!
    दुस-याच्या लेखी नसेल कदाचित ते तितकं भारी! पण आपलं आपल्याला मिळालेलं समधान असतंयंच की भारी! आधी आपणच आपल्या कामाला आहे तसं स्विकारलं नाही, त्याच्यावर प्रेम केलं नाही तर टीका, सुचना, सल्ले झेलायचं बळ कसं यायचं?!!
    आपलं मन आपल्याला सांगत असतं नेहमी. कधीतरी काम नाही येत छान जमून! पण ते काट मारलेले ड्राफ्टस्, डिलीट केलेले फोटो, वाया गेलेले canvas आपलेच आहेत की! 'ड' तुकडीतल्या मुलांना जीव लावणारा शिक्षकही असतो की! त्या शिक्षकाने त्या मुलाला दिलेली स्विकाराची भावना त्या मुलाला कुठलातरी चांगला विचार देऊन जाते!
    मला तो शिक्षक व्हायचंय. आपल्या सगळ्या कलाकृतींची जबाबदारी घेणारा आणि मग त्यांना अधिकाधिक समृद्ध करणारा!

Saturday, January 20, 2018

शब्दपुष्प..

"अच्छे राग के साथ जब एक अच्छी कविता की शादी होती है, तब अच्छे गाने का जन्म होता है!" इति सुश्री अजय चक्रवर्ती. 
'रागों से बने धून' कार्यक्रम सुरू आहे. अजयजी रागांतून होणा-या गाण्यांच्या जन्माबाबत सांगतायत, थोडं गातायत, बाकी शिष्यांकडून आणि सहगायकांकडून गाऊन घेतायत. अजयजींची गाणं शिकवण्याची पद्धत दुस-यांदा अनुभवण्याचं भाग्य लाभतंय. यांना ऐकताना आजूबाजूचं सगळं एका जागी स्तब्ध झालंय आणि ही व्यक्ती संगीतासाठी प्राण ओतून काम करत्ये, असं वाटतं आणि वाटतं की यांच्यानंतर, यांच्यासारख्यांनंतर काय? हा आजच्या पिढीबाबतचा अविश्वास अजिबात नाही! परंतू 'उत्तम शिक्षक' आणि 'उत्तम गायक' या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीच्या ठायी असणा-या अनेक व्यक्ती निर्माण झाल्या हव्यात असं मनापासून वाटतं, संगीतावर प्रेम करणारे तयार झाले पाहिजेत असं वाटतं. अजयजींसारखी माणसं सगळ्या गायन प्रकारांपलिकडे, सगळ्या घराण्यांपलिकडे गेली आहेत. हिंदी सिनेमांतली गाणी रागांवर कशी आधारलेली आहेत हे सांगताना ते केवळ शास्त्रीय संगीताच्या श्रेष्ठत्वावर भर देत नाहीत, प्रेक्षकांनी ओत:प्रोत भरलेल्या सभागृहात ते 'मेरे नैना सावन भायो' गाणा-या किशोरदांचंही मोठ्या मनाने कौतुक करतात. पण त्याच वेळी शास्राचं महत्त्व सांगायला विसरत नाहीत. त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे नि:स्वार्थी भावाने संगीत सेवेला अर्पण केलेलं पुष्प आहे जणू!
आपल्या मनात रूजलेल्या त्यांच्या शब्दरूपी बीजांचं पुष्पात रूपांतर होण्याच्या प्रतिक्षेत!