Friday, November 24, 2017

पनीर कबाब !

जनरली फिक्स टायमिंगची नोकरी असणाऱ्या लोकांचे ट्रेनमध्ये ग्रुप असतात. आणि एकंदरीतच आयुष्यात लांबचा पल्ला गाठायचं ध्येय असल्याने लग्नाआधी कळवा ते छशि(म)ट आणि नंतर बोरिवली ते चर्चगेट असा प्रवास होता. मला प्रवासाचं टेन्शन नव्हतं पण परदेशात कसं समोरची व्यक्ती ओळखीची असो वा नसो हलकं हसून ते समोरच्या व्यक्तीकडे बघतात आणि ग्रीट करतात. तसं माझंही बहुतांश वेळा होतं. त्यामुळे माझ्या मनात ही भीती होती की रोज तेच तेच चेहरे बघून कितीही प्रयत्न केला तरी अगदी मिनिमम स्मितहास्य तरी उमटेलच माझ्या चेहऱ्यावर आणि मग चक्रीवादळासारखं खेचलं जाईल मला एखाद्या ग्रुपमध्ये. त्यामुळे नोकरीच्या पहिल्या दिवसापासून मी ठामपणे ठरवलं होतं की ट्रेनमध्ये ग्रुप करायचा नाही. काही दिवसांनी बिचाऱ्या माझ्या आईने विचारलं, की ग्रुप वगैरे झाला की नाही ट्रेनमध्ये ? म्हटलं मी होऊच दिला नाहीये ! आई अपेक्षेप्रमाणे म्हणाली अशी कशी गं तू ! पण बाबांच्या डोळ्यांतले ते अभिमानाचे भाव मला आईला माझा विचार पटवून देण्याचं बळ देत होते. मी म्हटलं आई, बटाटा पटकन शिजायला हवा असेल तर काय करावं किंवा समुद्री मेथीचे पराठे कसे करावेत ? पिठलं करताना चण्याच्या पिठाच्या गुठळ्या होऊ न देता स्वादिष्ट पिठलं कसं मॅनेज करावं हे सगळं सांगायला तू आहेस, इंटरनेट आहे आणि अन्नपूर्णा पुस्तक आहे की ! त्यासाठी जातानाचा एक तास आणि येतानाच एक असे दिवसातले दोन तास मी का वाया घालवू ? "अगं असं नाही, उद्या काही मदत लागली, बरं वाटेनासं झालं अचानक तर या बायका करतात मदत!", इति आई. "हो गं, तुझी काळजी काळत्ये मला, पण असं कद्धीतरी शठी सहामाशी एकदा आणि तेही झालं तर होणार आणि त्यासाठी मी माझा इतका वेळ फुकट घालवू ? आणि यू डोन्ट वरी, माझा माझा वेगळा ग्रुप आहे. यातले मेम्बर्स रोज बदलत असतात. कधी लता दीदी, आशाबाई, किशोरीताई, देवकीताई...रोज ग्रुप बदलतो. पण दोघीजणी मात्र कायम माझ्या बरोबर असतात. निरीक्षण शक्ती आणि विचार शक्ती. या दोघी सॉलिड वेळ पाळतात. त्यांची ट्रेन कधीच चुकत नाही. त्यामुळे या दोघी माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणी झाल्यायत ट्रेन मधल्या. मजा येते त्यांच्याबरोबर गप्पा मारायला, कधी गाण्यांबद्दल, कधी सिनेमाबद्दल, कधी चित्रांबद्दल! काही ना काही सुचतंच मला लिहायला यांच्याशी गप्पा झाल्या की. मग नोट्सकरून ठेवते मी मोबाईलमध्ये किंवा कितीतरी वेळा तेव्हाच्या तेव्हा फेसबुक स्टेटस पण टाकते. मज्जा!" हं - आईला खात्री पटली की मुलगी एकटीच प्रवास करत असली चांगल्या संगतीत आहे!
आज कित्येक दिवसांनी पुन्हा त्या नेहमीच्या ट्रेनने गेले. हेडफोन्स घरी विसरले. पनीर कबाब कसे करायचे शिकायला मिळालं !

Wednesday, November 8, 2017

विस्तिर्ण नभाच्या वरती...

तीन दिवस होऊन गेले. पण हे दृश्य काही माझ्या डोळ्यांपुढून जात नाहीये.
विस्तिर्ण नभाच्या वरती, रात्रीचे काजळ काळे,
कुठे अलगद दडून बसले आकाश सुंदर निळे!
आता विमानाने ब-यापैकी प्रवास झाला. म्हणजे अनेकांच्या तुलनेत संख्येने कमी हे; पण 'विमानात बसण्याची' माझी हौस फिटली, म्हणून आपलं हे 'I am done' फिलींग. तरी अजुनही विमानाचा प्रवास हवाहवासा वाटतो तो एका वेगळ्या कारणासाठी. मला खूप गंमत वाटते की "एअरपोर्टला चाल्ल्ये" किंवा आम्हां मुंबईकरांना "T2ला चाल्ल्ये" हे सांगणं कसं असं छान प्रेस्टिजियस वाटतं. अर्थात, T2 आहेच तसं. पण विमानाचा प्रवास सुरू झाला की त्या अथांग आकाशाकडे पाहून, त्याचे सतत बदलणारे patterns पाहून, डोळ्यांत, मनांत साठवून घ्यावेत इतके मोहक रंग पाहून माझ्या ताठ झालेल्या अदृश्य कॉलरचा मला विसर पडतो आणि त्या निर्गुणाचं कौतुक करण्यातच माझा वेळ निघून जातो. म्हणजे मी अशी कल्पना करते की पुढे कधी मी कुठूनतरी माझ्याबाबत झालेल्या कौतुकाची पोतडी भरून घेऊन येत असेन विमानातून. मग मी तो वर म्हटल्याप्रमाणे सगळा नजरीया पाहेन. विमानाची खिडकी थोडीशी खाली करेन आणि कोण आहे रे तिकडे, हात करा जरा इकडे अशी दिशाहीन आरोळीवजा ऑर्डर ठोकेन आकाशात. मग पलिकडून एक हात माझ्या विमानाच्या खिडकीच्या दिशेने येईल. मग मी त्या हातात ज्या काही स्वरूपात माझं झालेलं कौतुक घेऊन येत असेन, ते ठेवेन. पलिकडच्यासाठी किंवा इतर कोणासाठीही त्याची किंमत काय असेल माहिती नाही. पण मला मात्र हे केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. पण मला खात्री आहे की पलिकडचा मनाने खूप चांगला असेल. नाहीतर इतक्या विस्तीर्ण, खोल आणि विशुद्ध आभाळाची निर्मिती कशी शक्य होती?!