Saturday, January 20, 2018

शब्दपुष्प..

"अच्छे राग के साथ जब एक अच्छी कविता की शादी होती है, तब अच्छे गाने का जन्म होता है!" इति सुश्री अजय चक्रवर्ती. 
'रागों से बने धून' कार्यक्रम सुरू आहे. अजयजी रागांतून होणा-या गाण्यांच्या जन्माबाबत सांगतायत, थोडं गातायत, बाकी शिष्यांकडून आणि सहगायकांकडून गाऊन घेतायत. अजयजींची गाणं शिकवण्याची पद्धत दुस-यांदा अनुभवण्याचं भाग्य लाभतंय. यांना ऐकताना आजूबाजूचं सगळं एका जागी स्तब्ध झालंय आणि ही व्यक्ती संगीतासाठी प्राण ओतून काम करत्ये, असं वाटतं आणि वाटतं की यांच्यानंतर, यांच्यासारख्यांनंतर काय? हा आजच्या पिढीबाबतचा अविश्वास अजिबात नाही! परंतू 'उत्तम शिक्षक' आणि 'उत्तम गायक' या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीच्या ठायी असणा-या अनेक व्यक्ती निर्माण झाल्या हव्यात असं मनापासून वाटतं, संगीतावर प्रेम करणारे तयार झाले पाहिजेत असं वाटतं. अजयजींसारखी माणसं सगळ्या गायन प्रकारांपलिकडे, सगळ्या घराण्यांपलिकडे गेली आहेत. हिंदी सिनेमांतली गाणी रागांवर कशी आधारलेली आहेत हे सांगताना ते केवळ शास्त्रीय संगीताच्या श्रेष्ठत्वावर भर देत नाहीत, प्रेक्षकांनी ओत:प्रोत भरलेल्या सभागृहात ते 'मेरे नैना सावन भायो' गाणा-या किशोरदांचंही मोठ्या मनाने कौतुक करतात. पण त्याच वेळी शास्राचं महत्त्व सांगायला विसरत नाहीत. त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे नि:स्वार्थी भावाने संगीत सेवेला अर्पण केलेलं पुष्प आहे जणू!
आपल्या मनात रूजलेल्या त्यांच्या शब्दरूपी बीजांचं पुष्पात रूपांतर होण्याच्या प्रतिक्षेत! 

No comments:

Post a Comment