Wednesday, March 18, 2020

#कोरोना२०२०


    मला टिव्ही बघायची शून्य आवड. बरीच वर्षं झाली टिव्ही रोजच्या जगण्यातून काढून टाकून. त्यामुळे भयंकर सिरियल्स, भयंकर बातम्या, भयंकर जाहिराती यांच्यापासून बराच काळ माझा बचाव मी करून घेत आले आहे. पण सध्या या कोरोना प्रकारामुळे आज बराच वेळ बातम्या बघितल्या गेल्या आणि खरोखर मला भीती वाटली की अजून थोडा वेळ मी हे असंच सुरू ठेवलं, तर नैराश्य येईल की काय! बातम्या बंद केल्या आणि गाणी ऐकायला लागले.
मित्रांनो, आत्ता मला यात दोष कोणाचा या मुद्द्यात अजिबात पडायचं नाहीये. कारण परिस्थिती इतक्या हातघाईवर आलीये की दुसऱ्यांना सुधारण्यापेक्षा आपल्यात बदल करणं सोपं आहे आणि ते जास्त लवकर केले जाऊ शकतायत, असं वाटलं म्हणून हे लिहिते आहे.
आजुबाजूच्या परिस्थितीला underestimate करून चालणार नाहीये किंवा आपण टिव्ही बघितला किंवा नाही बघितला म्हणून परिस्थितीसुद्धा बदलणार नाहीये. पण शारीरिक आरोग्याची काळजी घेत असताना आपलं मानसिक आरोग्य बिघडत नाहीये ना हे आपलं आपण तपासत रहायला हवंय. कितीतरी लोक कोरोनाचा संसर्ग झालाय असं वाटून किंवा त्या भीतीने स्वतःला काहीतरी करून घेतायत. बरेचसे लोक खूप घाबरले आहेत. प्लिज, आपल्या माणसांना आपण समजावूया की भीती वाटणं चुकीचं नाही किंवा त्यात लाज वाटण्यासारखंही काही नाही. Whatsapp, Instagram, facebook, TV वर फिरणारे मेसेज, फोटो, बातम्या या सगळ्यांच्या पचनी पडतीलच असं नाही. प्रत्येकाची मानसिक स्थिती आणि शक्ती वेगळी आहे. पुढे काय होणार आहे माहिती नाही. पण या सगळ्यातून जात असताना एक समाज आणि एक माणूस म्हणून एकमेकांची सर्वतोपरी काळजी घेणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. या एकूण परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर वाईट परिणाम होऊ द्यायचा नाहीये. सगळ्या प्रसारमाध्यमांपासून थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या. आपल्या आवडीची गोष्ट करा, घरातल्या माणसांशी 'कोरोना' हा विषय सोडून इतर काहीही बोला, सकारात्मक पुस्तकं वाचा, इ. केल्याने टेन्शन, भीती थोडी कमी होईल. गरज वाटलीच तर मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्या.
आज सगळ्या सीमांपालिकडे जाऊन फक्त एक माणूस म्हणून एकमेकांना मदत करायची गरज आहे.
Be positive! Let's hope for the best! Cheers!

Friday, February 28, 2020

मराठी भाषा दिन २०२०



    'निमित्तां'चं महत्व आयुष्यात फार आहे. म्हणजे जगात एका वेळी कोट्यावधी गोष्टी घडत असतात. कुठल्यातरी निमित्तामुळे आपलं लक्ष एखाद्या मुद्द्याकडे किंवा गोष्टीकडे वेधलं जातं. त्याहीपलीकडे जाऊन असं म्हणावसं वाटतं की त्या गोष्टी २४ x ७ x ३६५ आपल्या आयुष्याचा भाग असल्या तरी एखाद्या निमित्ताने त्यांचं अस्तित्व अधोरेखित केलं जातं. पण एक गंमत आहे. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी असल्यामुळे बहुतेकदा निमित्ताने एखाद्या गोष्टीची आठवण करून दिली तरी आपण त्या गोष्टीच्या चांगल्या बाजूकडे लक्ष देतो आणि तिथेच थांबतो. पण मला असं वाटतं की सतत उलथापालथ होत असलेल्या या महाकाय जगात कुठल्या तरी निमित्ताने एखाद्या बारीकशा गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं गेलंच आहे, तर उत्सव करून झाला की त्या गोष्टींचा सर्वांकष विचारही करावा. प्रगतीसाठी. तसंच आज केलंय थोडं स्वपरीक्षण...मराठी भाषेबद्दल. गेल्या वर्षी मराठी भाषेला पत्र लिहिलं होतं छोटंसं. पण या मागच्या वर्षभरात त्या मानाने लिखाण तसं थोडं कमी झालं. अलीकडेच एक दिवस अचानक लक्षात आलं की त्या दरम्यान वाचत असलेलं पुस्तक, पाहत असलेली वेबसिरीज आणि त्या क्षणी ऐकत असलेलं गाणं हे सगळं इंग्रजी होतं. शिवाय दिवसभरात कामाच्या निमित्ताने बोललं जाणारं इंग्रजी वेगळंच. इंग्रजी बरोबर शिवाय आजुबाजूला हिंदी, गुजराती आणि मराठी या भाषाही बोलल्या जातात. त्यामुळे सध्या भाषांची सरमिसळ बऱ्यापैकी होत्ये, किमान बोलताना तरी एक मराठी भाषाप्रेमी म्हणून थोडी काळजी वाटावी इतकी नक्कीच ! कुठल्या एका विशिष्ट भाषेबद्दल आकस अजिबात नाही. प्रत्येक भाषा ही स्वतंत्र आहे आणि प्रत्येकीचं, प्रत्येकासाठी महत्व वेगळं आहे. फक्त या दिवसाच्या निमित्ताने ज्यांना कुणाला अशी थोडीशी काळजी वाटत्ये आपलीच, त्यांनी स्वतःला थोडीशी आठवण करून देऊया प्रयत्नपूर्वक आपल्या प्रमाण मराठी भाषेची जपणूक करण्याची. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !

Saturday, February 15, 2020

A gentle reminder!

Happy Valentine's Day, Bhakti !!!

    कालच मनात एक विचार येऊन गेला, की माणसं आपल्याला आणि आपण माणसांना कुठल्या फेज मधे भेटतो यावर कुणाही; अगदी कुणाही दोन व्यक्तींमधलं equation किती अवलंबून आहे ना ! त्यात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, बदलणाऱ्या गोष्टी या कुणाही दोन व्यक्तींमधल्या नात्याला खूप वेगवेगळे आकार आयुष्यभर; म्हणजे त्या नात्याचं जितकं काही आयुष्य असेल; त्या काळात सतत वेगवेगळे आकार देत असतात. काही नात्यांची वीण घट्ट होते, काहींची सैल होते, काही नाती तोंडदेखली उरतात, काही विरून जातात. पण एक नातं आयुष्यभर आपल्यासोबत राहतं. आता 'आयुष्यभर' म्हणजे खरंच, जितकं आपलं आयुष्य आहे, तितकं. ते म्हणजे स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं. पण आपण जितकं दुसऱ्यावर निःस्वार्थी, मनमोकळं प्रेम करतो, तितकं स्वतःवर करतो ? जितका दुसऱ्याच्या बारीक सवयींचा आढावा घेतो, तितकं स्वतःच्या बदलत आलेल्या सवयी, आवडी-निवडींकडे लक्ष देतो ? जितकं सहज बरोबरच्या व्यक्तीला माफ करतो, तितकं स्वतःला करतो ? जितकं दुसऱ्याचं आपल्यावरचं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तितकं आपलं स्वतःवरचं प्रेम वाढावं यासाठी वेळ काढतो ?

    स्वतःवर प्रेम असणं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठीही फार महत्वाचं आहे. आपणही कधीतरी emotionally दमू शकतो, चुकू शकतो, नेमकं काय वाटतंय, कशाचं रडू येतंय, कशामुळे negative फिलिंग आलंय हे कळेनासं झालंय असं होऊ शकतं, insecurity वाटू शकते, भीती वाटू शकते. आपण आपल्याबरोबरच्या कुठल्याही व्यक्तीला जेव्हा हे सगळं वाटतं, तेव्हा it's ok असं सहज म्हणून जातो, तीच सहजता आपल्याही हक्काची आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे, मी कायमच बरोबर असं मत असण्याचा फाजील आत्मकेंद्रीपणा अजिबात नाही, पण स्वतःशी थोडं अधिक चांगलं वागायला काय हरकत आहे?! आधी स्वतःला आपलं म्हटल्याशिवाय दुसऱ्याला आपलंस कसं करता यावं ?! Let's remind ourselves to love ourselves as well on this beautiful day!


Wednesday, January 1, 2020

Thank you 2019 !

    कुठलंही वर्ष संपत आलं की त्या वर्षाला थँक्यू म्हणून संपेपर्यंत एकीकडे नवीन वर्षाकडून आपल्या असलेल्या मागण्यांची यादी वाढायला मनात सुरुवात झालेली असते. पण हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे वेळ घेऊन या वर्षाला थँक्यू म्हणणार आहे.

    सगळेच अनुभव काही ना काही शिकवून जातात. एखाद्या अनुभवावर 'बरा' किंवा 'वाईट' हा मारलेला शिक्का हा एखाद्या तळ्याकडे आपण लांबून पाहणं आणि त्याच्या जवळ जाऊन तळाशी काय सापडतंय हे पाहणं यातला जो फरक आहे, तसा काहीसा आहे. २०१९ ने मला काय दिलं असा विचार करताना कुठून सुरवात करू असं होतंय. कारण या वर्षाने माझी मला एक नवी ओळख करून दिली. या वर्षाने मला संयम शिकवला. चांगुलपणा आणि भोळेपणा यात फरक आहे, हे समजावून दिलं. प्रसंगी राग व्यक्त करणं गरजेचं असतं हे शिकवलं. खूप महत्वाचं म्हणजे 'नाही' म्हणायला शिकवलं. जास्तीत जास्त स्वावलंबी व्हायला शिकवलं. आपल्या जवळच्या माणसांची नव्याने ओळख करून दिली. त्यांचं महत्व जाणवून दिलं. आयुष्य लहान आहे! ते शक्य तितकं भरभरून जगून घ्यावं, या पुस्तकी वाक्याची खऱ्या अर्थाने जाणीव करून दिली. मला धीट केलं. स्वतःच्या मतांबद्दल ठाम रहायला शिकवलं. 'लोक काय म्हणतील' हा विचार किती दुय्यम आहे, याची जाणीव करून दिली आणि लोक 'त्यांच्या मतांप्रमाणे' काही ना काही म्हणतच राहतील, याची खात्री करून दिली. अतिशय महत्वाचं म्हणजे स्वतःला महत्व द्यायला शिकवलं. स्वतःचं महत्व जाणून घ्यायला शिकवलं. स्वतःवर, स्वतःच्या गुणांवर विश्वास ठेवायला शिकवलं आणि योग्य त्या वेळी स्वतःला शाबासकी द्यायलाही शिकवलं.

    दुसऱ्या कुणाशी स्पर्धा नाही आणि आदर्शतेची आस नाही, आयुष्यभराचं ज्ञान मिळवून झालं, असा दावा तर अजिबातच नाही. पण माझ्या नजरेत माझ्या लेखी माझी जी काही थोडीशी 'सेल्फ ग्रोथ' झाली, ती घडवण्यास हातभार लावणाऱ्या अनुभवांना आणि माझ्या आप्तेष्टांना मन:पूर्वक धन्यवाद !
२०१९, आजन्म तुझ्या ऋणांत,
- भक्ती


Wednesday, November 13, 2019

प्रवास : अमृतसर : गोल्डन टेम्पल

    'गोल्डन टेम्पल'बद्दल खूप ऐकलं होतं. 'रंग दे बसंती'मुळे एकंदरीतच पंजाबच्या कल्चरबद्दल थोडं आकर्षण वाढलं होतं. ए. आर. रेहमानच्या 'इक ओंकार सतनाम'मुळे त्यात मोलाची भर पडली होती. सिनेमातल्या गोष्टी शंभर टक्के खऱ्या मानून त्याला भुलून जाणाऱ्यातली मी नाही. पण एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल निर्माण झालंच, तर चांगलंच आहे की ! आता गोल्डन टेम्पल प्रत्यक्षात बघता येणार याचा खूप आनंद होता. पण एकीकडे एक भाबडी भीती होती मनात. मला श्रीमंत आणि ग्लॅमरस देवळांत जाण्यात फारसा रस नसतो. म्हणजे कळत्या वयाप्रमाणे तो रस कमी होत गेला. कारण मला अशा देवळांमध्ये कधीच हवं तितका वेळ शांतपणे मनाचं समाधान होईपर्यंत बसता आलेलं नाही. यात मी देवळांना दोष देत नाहीये, मी कुठेतरी कमी पडले असेन. पण थोडक्यात, याआधी तरी माझं आणि अशा देवळांचं हार्ट-टू-हार्ट कनेक्शन काही झालं नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा हाच अनुभव येणार की काय याची थोडी भीती होती. पण गर्दीतल्या शांततेचा अनुभव मी तिथे घेतला. बरं, बसले कुठे होते, तर झाडाखाली. गाभाऱ्यात गेलेच नाही. मी काहीतरी कदाचित मिस केलं असेन, पण मला जी शांतता अपेक्षित होती, ती आजूबाजूला अनेक माणसं असतानाही मिळाली याचा आनंद आहे. कबीर म्हणतातच की, मोको कहाँ ढूंढें बन्दे, मैं तो तेरे पास में । खरंय !


Monday, February 18, 2019

सिनेमा : आनंदी गोपाळ

    बरेचदा ऐकलंय, माणसं काही कार्यासाठी जन्म घेतात. कार्य झालं की पुढच्या प्रवासासाठी निघून जातात. काल आनंदी बाईंचं आयुष्य पडद्यावर पाहताना मला पहिल्यांदा या विचाराची प्रचिती आली. अवघ्या २२ वर्षांच्या आयुष्यात लग्न, बाळंतपण आणि डॉक्टरेट? त्यांच्या काच-बांगडी खेळायच्या वयापासूनच आयुष्य किती वेगाने बदलत गेेलं! आपली आपल्यालादेखिल हळुहळू ओळख होत असते. पण एखाद्या भावनेशी मैत्री होईपर्यंत ती नाहीशी होऊन नव्या परिस्थितीशी जुळवाजुळव सुरू!

    ज्या बाईने इतक्या कष्टाने स्वत:चं आणि गोपाळरावांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने मृत्यूने गाठावं याहून दुर्दैवं ते काय! पण त्यांचं कार्य स्वत: डॉक्टर होण्यापेक्षाही पलिकडचं होतं. इतर स्रियांना प्रेरित करण्याचं होतं. समाजाची प्राथमिक घडी बसल्यानंतर आपण जन्म घेतलाय, आपल्याला सगळं तयार मिळालंय, म्हणजे आपण किती भाग्यवंत?!

    काळाच्या पुढे विचार करणा-या माणसाला इतरांकडून होणा-या प्रतारणेला सामोरं जावंच लागतं. गोपाळरावांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून आपल्या पत्नीने आपल्यापेक्षाही जास्त शिकावं यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांबाबत तर काय बोलावं?!
सिनेमाच्या सगळ्याच बाजू उत्कृष्ट! गोष्टीचा वेग अगदी संयत. सर्वांचा अभिनय अगदी साजेसा! गोष्ट पुढे नेणारं काळाला साजेसं संगीत. संवेदनशील दिग्दर्शन! थोडक्यात सिनेमा अगदी सुरेख आणि प्रेरणादायी!
सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा आवर्जुन पहा!


Monday, November 12, 2018

सिनेमा : '...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर'

    '...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' सिनेमा पाहिला. सिनेमा किती उत्तम आहे हे मी काही पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. पण सिनेमा बघताना मला एका गोष्टीचं वाईट वाटलं ते असं की सोशल मीडिया आणि दूरदर्शनच्या चॅनल्सनी आपण इतके वेढले गेलो आहोत, की त्यामुळे आपल्याकडची कलाकारांविषयीची नाविन्याची भावना थोडी लुप्त झालीये. म्हणजे एखाद्या सुपरस्टारचं आकर्षण कोणाला नसतं, पण चित्रपटाच्या पोस्टरवरचा कलाकार (तेही बहुतेकदा त्या कलाकाराचं पोर्ट्रेट रंगवलेलं, फोटो नव्हेच!) कधीतरीच प्रत्यक्षात बघायला मिळणं, गर्दीतून वाट काढून त्याला सेकंदभरासाठी स्पर्श करता येणं आणि त्यानंतर 'अमुक एका कलाकाराला प्रत्यक्षात बघणाऱ्या काही मोजक्या भाग्यवंतांपैकी आपण एक आहोत' ही निर्माण झालेली कमालीची फिलिंग दुर्दैवाने आमच्या पिढीच्या वाट्याला येणे नाही ! आपण आपल्या आवडत्या कलाकारांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, सोशल मीडियावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये सतत पाहत असतो; इतकंच कशाला 'facebook / instagram live' मधून थेट संवादही साधत असतो. त्यामुळे '#fan moment' ही routine चा भाग झालेली असताना आपण डॉ. काशीनाथ घाणेकरांच्या आजूबाजूच्या गर्दीइतके भाग्यवंत नाही, असं वाटतं. सोशल मीडिया ही आजची गरज आहे, त्यामुळे त्याला दोष देण्याचा अजिबातच उद्देश नाही, फक्त ती 'नवखेपणाची' मजा मिस करत असल्याचं छोटंसं दुःख आहे! 

    लेखक-दिग्दर्शक, कलाकार मंडळी, संगीताची बाजू सांभाळणारे कलाकार, संपूर्ण टेक्निकल टीम आणि या चित्रपटाच्या टीममधला प्रत्येक कलाकार; यांचं अतिशय मनापासून अभिनंदन ! सगळ्यांचीच उत्कृष्ट कामं ! ज्यांनी सिनेमा पहिला नाही त्यांनी बघा, तिकीट मिळालं तर नक्की जा पाहायला !