Saturday, July 8, 2017

चांगुलपणा is the new COOL !

                   माझा चांगुलपणावर खूप विश्वास आहे हे मी आधीच्याही काही फेसबुक पोस्टमध्ये, ब्लॉग्जमध्ये म्हटलं आहे. तो कसा तर अगदी रोजच्या रूळलेल्या ट्रेनप्रवासात येणाऱ्या अनुभवापासून ते आडगावात केवळ गाडीचा लाईट सोबतीला असताना अनोळखी माणसाबरोबर एका प्रोजेक्टनिमित्त केलेला प्रवास असो, आजवरच्या आयुष्यात तरी चांगुलपणा माझ्या वाट्याला भरभरून आलाय. कधी कधी वाटतं की हा आपल्या नशिबाचा भाग असावा, कधी वाटतं समोरच्याचा उदारपणा असावा पण बरेचदा असं जाणवतं की हा प्रकार वन वे नाहीये, हा 'टू वे कम्युनिकेशन'चा भाग आहे. कम्युनिकेशन शब्दांचं नव्हे; भावनांचं, माणुसकीचं. 'पेरावे तसे उगवते' या उक्तीची प्रचिती घेते मी बरेचदा. वर आडगावाचा उल्लेख केला तो किस्सा सांगते. एका फिल्मच्या रिसर्चसाठी मी कोकणात गेले होते. एका काकांनी त्यांच्या ओळखीच्या सद्गृहस्थाची गाडी माझ्यासाठी बुक केली. या सद्गृहस्थाने दीड दिवस मला त्याच्या गाडीतून आसपासच्या छोट्या छोट्या गावांमध्ये फिरवलं. तिथे जाऊन मी आमच्या फिल्मसाठी आवश्यक ती माहिती घेतली. गावं खरंच खूप छोटी आणि बरीच आत आत होती. म्हणजे एखाद्या गल्लीच्या तोंडाशी आहोत असं वाटावं आणि पुढे गेल्यावर अक्खं गाव वसलेलं दिसावं. बरं, दिवसा ठीके. रात्रीचं काय? रस्त्यावर एकही लाईट नाही. एकावेळी एकच गाडी रस्त्यावरून जाईल इतक्या रूंदीचे रस्ते. दोन्ही बाजूला पाच फूट उंचीची दाटी करून उभी असलेली गवतं. एरवी 'हिरवे हिरवे गार गालिचे' असणारं तेच गवत काळोखाच्या वेळी मात्र उगाच 'काजळ रातीनं ओढून नेला' या गाण्याची आठवण करून देतं. माझंही काहीसं तसं झालं आणि ते या सद्गृहस्थाच्या लक्षात आलं असावं. कारण त्याने लगेच 'मुंबई' या विषयावर गप्पा सुरू केल्या. त्यातही सब-टॉपिक काय होता तर...मुंबईतली महागाई. म्हणजे किती चाणाक्ष असावं एखाद्याने! या महागाईच्या भूतापुढे हा आत्ताचा काळोख ही मुलगी हमखास विसरून जाईल हे या पठ्ठ्याने ओळखलं असावं. पण हे gesture किती सुंदर आहे! त्या दोन तासांच्या प्रवासात आपल्याबरोबरच्या व्यक्तीला comfortable करण्याची गरज कधी आहे हे ओळखून त्यासाठी प्रयत्न करणं! आणि खरं सांगते, त्या अख्ख्या प्रवासात मला एका क्षणासाठीही त्या माणसाबरोबर unsafe वाटलं नाही आणि असं चांगलं वागून त्याला काय मिळणार होतं ? आमची पुन्हा भेट होण्याची शक्यताही दुरापास्तच होतं ! मग याला चांगुलपणा नाही म्हणायचं तर काय! 
               तसंच 'मुंबईची ट्रेन म्हणजे बेक्कार!' असे संवाद आपण बरेचदा ऐकतो! पण ती वापरणारे आणि तिला बेक्कार करणारेही आपणच सगळे असतो ना ! असं असलं तरीही भगवद्गीतेतल्या निष्काम कर्माचा कित्येक वेळा अनुभव मी याच ट्रेनमध्ये घेतलाय, प्रचंड गर्दी असणाऱ्या लोकलमध्ये 'सीट विचारण्यात काही पॉईंटच नाहीये, त्यामुळे उभं राहूया ना यार !' असा आपल्याच एका मनाचा दुसऱ्या मनाशी चाललेला संवाद शेजारच्या बाईच्या मनाला ऐकू येतो. मग आपल्याला 'अहो वाहिनी, हळदी-कुंकवाला आलात आणि डिश न घेताच कशा काय जाऊ शकता ?' या इंटेन्सिटीने बसायचा आग्रह ती बाई करते. तसंच बरेचदा तिसऱ्या सीट वर बसलेल्या बाईला काहीही न बोलता जितकी जागा आहे तेवढ्यात बसणं झेपत असेल तर बसलं आणि आपल्या पायांमुळे कुणाला दोन सीट्सच्या मधनं जाता येत नसेल तर (मनातही) शिव्या-शाप न देता उठलं की तिसऱ्या सीट वरच्या बाईतली निरुपा रॉय जागी होते आणि ती दुसऱ्या साईटवरच्या बाईने केलेली वाकडी तोंडं बघूनही आपल्याला मात्र आणखी थोडी जागा करून देते. हे असं कसं होतं ?!   
        माझे मित्र-मैत्रिणी म्हणतात बरेचदा, तुला जग चांगलंच दिसतं नेहमी. त्या ट्रीपमध्येही त्या माणसाने अशा आडजागी तुला काही केलं असतं म्हणजे? प्रश्न, मतं यांचा भडीमार होतो कधीकधी. त्यांची काळजी चुकीची नसते. पण मला असं वाटतं की त्यावेळच्या vibes आपल्याला कसं वागावं याबाबत गाईड करत असतात आणि आपण प्रेमाने, चांगूलपणाने वागलो तर समोरून बहुतांश वेळा चांगलाच प्रतिसाद मिळतो. पण यात मुख्य वाटा आपल्या कृतीचा आहे. तुम्ही म्हणाल की म्हणजे आजवर कधी वाईट अनुभव आलेच नाहीयेत का तुला ? तर असं नाही. चांगल्या अनुभवांचं मोल वाढवतात वाईट अनुभव. त्यामुळे तेही यायलाच हवेत. पण आपण ती सिच्युएशन कशी हॅण्डल करतो त्यावर आपला त्यावेळचा एकूण अनुभव काय असणारे हे ठरतं ना. समोरच्या 'अरे'ला 'कारे' उत्तर दिल्यानंतर तो प्रसंग पॉझिटिव्ह नोट वर संपू शकणारच नाही! पण तेच जर आपण थोडंसं सामंजस्याने घेतलं तर समोरची व्यक्तीही शांत होऊ शकते. कदाचित् आपल्याकडून प्रेरणा घेऊन रागावलेली व्यक्ती आपल्याकडून चांगलं शिकून जाईल ! 
           मला रँडम विचार येत असतात मनात कधीकधी. तसंच वाटून गेलं की कुठल्याही गॅजेटची किंवा फॅशनची लाट जशी आपल्याकडे पसरत जाते, तशी चांगुलपणाची लाट पसरत गेली तर काय मजा येईल ना! म्हणजे कोणीच कोणाशी भांडत नाहीये, कोणी कोणाला तुच्छ लेखत नाहीये, दान..मग ते कुठल्याही स्वरूपातलं असेल ते गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचतंय, दानशूर व्यक्ती ते चॅरीटी सर्टिफिकेटसाठी नाही तर समाधानासाठी करतायत, वयस्कर व्यक्ती खूप आनंदात आहेत, सगळे त्यांची काळजी घ्यायला तत्पर आहेत, प्रत्येकजण आपला परिसर आपल्या घरासारखा स्वच्छ करतोय, षड्-रिपूंचा कुठे नामोनिशान नाहीये इत्यादी. काय वेगळंच होईल आपलं जगणं, वावरणं ! पण दुसरा करेल याची वाट बघत बसलो की संपलं. आयुष्यात आपण कधीतरी कुठल्यातरी गोष्टीची सुरुवात करूया की ! बाकी आपण धार्मिक चालीरीतींपासून ते तिकिटाच्या रांगेपर्यंत सगळीकडे कुणाला ना कुणाला फॉलोच करत असतो. त्यामुळे चांगुलपणाची फॅशन आपल्यापासून सुरु करूया. आपले फॉलोअर्स तयार होण्यातली गंमत अनुभवूया !
      कधी कधी काही व्यक्ती इतक्या चांगल्या भेटतात आपल्याला की कळत नाही की नेमकी ही व्यक्ती खरीच चांगली आहे की हा देखावा आहे? यातल्या काही खरंच अत्यंत शुद्ध चित्ताच्या व्यक्ती असतात. कारण हल्ली आपल्याला कोणी अतिशय चांगलं असण्याची सवयच राहिली नाहीये बहुदा. कोणी खूप चांगलं वागलं की आपल्यातला शंकासूर जागा होतो. पण मोठ्या विश्वासाने आपण आपल्यात चांगुलपणा रूजवायला सुरूवात केली तर हळुहळू विश्वास बसेल आपला लोकांतल्या चांगुलपणावरही!
       पण या सगळ्यात 'चांगुलपणा' हे लेबल नेमकं लावायचं कशाला? आपण चांगलं वागतोय की नाही हे तपासायचं कसं ?  असे प्रश्न पडतात. सोपं आहे. पुन्हा कधीच भेट होण्याची किंवा संपर्क होण्याची शक्यता नसलेल्या कुणाही अगदी कुणाही व्यक्तीशीसुद्धा आपण चांगले वागतोय का ? हे आपलं आपल्याशीच तपासत राहायचं. बरंं या परीक्षेत प्रश्न विचारणारेही आपणच आहोत आणि उत्तर देणारेही आपणच. त्यामुळे किती प्रामाणिकपणे परीक्षा घ्यायची आणि द्यायची हेही आपणच ठरवायचं ! :)